मुंबई : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये, म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्या आहेत. मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने त्याबाबतची माहिती दिली.
ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड आणि एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले आहे.