दहावी-आयटीआय उत्तीर्ण उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करता येणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) तरूणांसाठी टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) ही टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया जारी केली आहे. ही भरती एकूण ९ हजार जागांसाठी असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र, अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
ही भरती प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये म्हणजे याच महिन्यात सुरू होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मात्र, मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर (indianrailways.gov.in) भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल.
या भरतीसाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच आयटीआय उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शिवाय, इच्छुक उमेदवाराकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.