१२२ मालमत्ता सील; १०८ नळजोडण्या तोडल्या
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने थकीत १२२ इमले आणि सदनिका सील केल्या. त्याचबरोबर १०८ नळ जोडण्या तोडल्या. चालू आणि थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ८ वसुली पथकांनी करवसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली. एकूण १४ कोटी रुपये मागणीपैकी तब्बल ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असल्याचे वसुली विभागाचे प्रमुख नरेश आखाडे यांनी सांगितले.
शहरामध्ये सुमारे २९ हजार मालमत्ता आहेत. थकीत मालमत्तांची करवसुली करण्यासाठी रनपने घरोघरी किंवा मालमत्ताधारकांकडे जाण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी पडणार असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून करवसुलीला प्राधान्य देण्यात आले.
मुख्याधिकारी तुषार बाबर यांनीही वसुली पथकासोबत जाऊन थकीत मालमत्ता कर भरण्याची विनंती केली. शहरातील २९ हजार मालमत्ताधारकांपैकी ज्यांचे कर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे होते त्यांच्याकडे वसुलीसाठी पथके जात होती. ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असून, अनेकांनी धनादेश दिले आहेत, ते बँकेत टाकून वटल्यानंतर ही करवसुली रक्कम वाढणार आहे.