हिमाचल आणि ओडिशा वगळता अन्य राज्यात मात्र पावसाने घेतली पूर्ण विश्रांती
शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने (Rain Alert) सगळीकडे हाहाकार उडाला आहे. मागील चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसात ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ७ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त ३२७ लोकांचा मृत्यू झाला असून १७०० पेक्षा जास्त घरे नष्ट झाली आहेत.
हिमाचल प्रदेश सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी सफरचंद उत्पादकांना एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे सफरचंदांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात दरवर्षी २४ ते २८ किलो वजनाच्या ३ ते ४ कोटी पेट्या सफरचंदाचे उत्पादन होते. यंदा मात्र १ ते ४ कोटी पेट्याच उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.
शेजारील ओडिशा राज्यातही पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला तर ७ लोक जखमी झाले आहेत. बालासोरमध्ये ३ आणि भद्रक जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला. तसेच मयूरभंज जिल्ह्यातही एका जणाचा मृत्यू झाला.
देशात अन्य राज्यात मात्र पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे या राज्यातील पिके संकटात सापडली आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने सर्वाधिक पावसाचे आहेत. या महिन्यात जर पावसाला ब्रेक लागला तर पहाडी भागात ढग गोळा होतात आणि येथेच जोरदार पाऊस पडतो. यामुळेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आणखी ५ ते ७ दिवस मान्सून ब्रेक असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.