आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी खासदार राहुल गांधी यांची भूमिका काय आहे? त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर साधे एक ट्विट तरी केले आहे का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार राणे म्हणाले की, खासदार संजय राऊत यांचे म्हणणे आहे की उबाठाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना जाऊन भेटणार आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारला लक्ष घालायला सांगा, असे म्हणणे राऊत यांचे आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलावे. महाविकास आघाडीचे नेते उठसुठ पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट दाखवता आहेत. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेत्यांनी आरक्षण प्रश्नी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. या नेत्यांना माझा सवाल आहे की, उठसुठ मोदींकडे, केंद्राकडे बोट दाखवता. मग मराठा आरक्षण प्रश्नी खासदार राहुल गांधी यांची काय भूमिका काय आहे? त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर साधे एक ट्विट तरी केले आहे का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
पाच राज्यांत निवडणूक असून तिथे जाऊन राहुल गांधी भाजपा विरोधात विष पेरत आहेत. मग जरांगे पाटलांना एक फोन करावासा का वाटला नाही, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यास सांगा, किंवा एक ट्विट तरी करण्यास सांगावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मराठा आरक्षणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेत असल्याचे आमदार राणे म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका मांडत नसल्याने त्यांना मराठा आरक्षणाचे विरोधक मानायचे का? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. दिवाळीच्या आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही फराळ खाऊ, असे राणे म्हणाले.