Tuesday, May 14, 2024
HomeदेशRozgar Mela : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत केले ५१,००० नियुक्तीपत्रांचे...

Rozgar Mela : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत केले ५१,००० नियुक्तीपत्रांचे वितरण

महाराष्ट्रातही नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि नांदेड या ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यात आज केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत (Rozgar Mela) नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण केले आणि उमेदवारांना संबोधितही केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत.

देशभरात ४६ ठिकाणी आज या रोजगार मेळ्याचे (Rozgar Mela) आयोजन करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील पनवेल, नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि नांदेड या ठिकाणांचा समावेश होता. नवी मुंबईतील पनवेल इथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, नागपूरमध्ये केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पुणे इथे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान तसच कौशल्य विकास आणि उद्योग व्यवसाय राज्यमंत्री राजीव चंदशेखर आणि नांदेड इथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री इथे रावसाहेब‌ पाटील दानवे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संबोधित करताना, पंतप्रधानांनी आज नियुक्ती पत्रे मिळालेल्यांचे अभिनंदन केले. हे सर्व जण त्यांचे अथक परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर येथपर्यंत पोहोचले असून लाखो उमेदवारांमधून ते निवडले गेले आहेत, देशभरात सध्या गणेशोत्सव साजरा केला जात असताना या नवनियुक्तांच्या नवीन आयुष्याचा श्री गणेशा अशा मंगल समयी होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. श्री गणेश हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा सिद्धिदाता असून नवनियुक्त उमेदवारांची सेवेप्रती असलेली निष्ठा देशाला आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

देश अनेक ऐतिहासिक कामगिरींचा साक्षीदार होत आहे असे सांगून पंतप्रधानांनी देशातील निम्म्या लोकसंख्येला सक्षम करणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकाचा उल्लेख केला. गेल्या ३० वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विक्रमी मताधिक्याने संमत झाले. नवीन संसद भवनाच्या पहिल्याच सत्रात या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले म्हणजे एका अर्थी नवीन संसद भवनात संमत झालेले नारी शक्ती विधेयक हा देशासाठी एक नवीन प्रारंभ ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

२०४७ पर्यंत विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षात आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल आणि आगामी काळात सरकारी कर्मचाऱ्यांना खूप योगदान द्यावे लागेल असे सांगून या कर्मचाऱ्यांनी नागरिक प्रथम या दृष्टिकोनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे पंतप्रधानांनी सांगितले.

देशाच्या आणि नोकरीत समाविष्ट झालेल्या नव्या उमेदवारांच्या जीवनात अमृत काळातील पुढील २५ वर्षांचे महत्त्व पंतप्रधानांनी पुन्हा अधोरेखित केले. पंतप्रधानांनी त्यांना सांघिक कार्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितले. जी २० मधून आपली परंपरा, संकल्प आणि आदरातिथ्य उत्तम प्रकारे प्रतीत झाले. हे यश देखील विविध खासगी आणि सार्वजनिक विभागांचे यश आहे. जी २० च्या यशासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम केले. “मला आनंद आहे की आज तुम्हीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या टीम इंडियाचा भाग बनत आहात”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भर्ती झालेल्या व्यक्तींना थेट सरकारसोबत काम करण्याची संधी आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपला शिकण्याचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी iGOT कर्मयोगी पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नवनियुक्त उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आणि पुढील २५ वर्षांत विकसित राष्ट्राचा संकल्प घेण्याचे आवाहन केले.

नवी मुंबईतील पनवेल इथे ३५६ जणांना नियुक्ती पत्रे प्रदान

नवी मुंबईतील पनवेल इथे झालेल्या रोजगार मेळाव्यात २५ युवक-युवतींना प्रत्यक्ष नियुक्ती पत्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. भारतीय टपाल विभागाच्या वतीने झालेल्या या रोजगार मेळाव्यात यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गोयल म्हणाले,” आज तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. तुम्हाला व्यवस्थेचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना करू शकता आणि समाधान मिळवू शकता. तुम्ही इतरांमध्ये जो बदल पाहू इच्छिता तो बना. 140 कोटी भारतीयांच्या जीवनात बदल घडवा. समाजसेवेच्या भावनेने काम करा”.

पुण्यात १९३ जणांना नियुक्ती पत्रे प्रदान

सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या जीवनाबरोबरच व्यक्तिगत आयुष्यात देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची संधी तुम्हाला मिळाली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन राजीव चंद्रशेखर यानी यावेळी उपस्थित उमेदवारांना केले. पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 193 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान तसच कौशल्य विकास आणि उद्योग व्यवसाय राज्यमंत्री राजीव चंदशेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सीमा रस्ते संघटना, भारतीय टपाल विभाग, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन विभाग ,भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, भारतीय गोदाम महामंडळ, वित्तीय सेवा आणि भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी विभागातील नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे उपस्थित उमेदवारांना देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -