२०१४च्या आधी केंद्रात महाराष्ट्रातले कृषिमंत्री असताना दिल्लीतून पॅकेज जाहीर व्हायचे, पण यूपीएच्या भ्रष्ट सरकारमुळे शेतकऱ्यांसह महिलांना पैसे मिळतच नव्हते
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळच्या भारी या परिसरामध्ये सभा पार पडली. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना मोदी यांनी यूपीए सरकारच्या काळातील कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसह महिलांना कोणत्याही योजनेचा पूर्ण लाभ मिळत नव्हता. विशेष करून २०१४च्या आधी महाराष्ट्रातील कृषीमंत्री केंद्रत होते. तेव्हा केंद्रात युपीएचे भ्रष्ट सरकार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीच थेट लाभ मिळाला नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्रात जेव्हा युपीए सरकार होते तेव्हा तेव्हाची स्थिती काय होती. तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्राचेच होते. त्यावेळी दिल्ली ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज जाहीर व्हायचे. पण मध्येच लुटले जायचे. गाव, गरीब, शेतकरी, आदिवासींना काही मिळत नव्हते. आज मी एक बटन दाबले आणि पीएम किसान योजनेचे २१ हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खातेवर पोहोचले. ही तर मोदींची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले.
केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा तर १५ पैसे पोहोचत होते. जर काँग्रेसची सरकार असते तर शेतकऱ्यांना २१ हजार करोड मिळाले आहेत, त्यातील १८ हजार करोड मध्येच लुटले असते. पण आता भाजपाचे सरकार असल्याने गरीबांचा संपूर्ण पैसा गरीबांना मिळत आहे, अशी सडकून टीकाही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.
देशात पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे म्हणूनच तर देशातील प्रत्येक लाभार्थ्याला पैसे बॅंकेत मिळत आहेत. आता तर राज्यातील शेतकऱ्यांकडे डबल इंजिनची डबल गॅरंटी आहे. ही मदत सोडून आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ३ हजार ८०० कोटी रुपये वेगळे ट्रान्सफर झाले आहेत. पीएम किसान योजनेतून १२ हजार प्रत्येक वर्षी मिळत आहेत. आत्तापर्यंत ११ हजार करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ लाख करोड रुपये जमा झालेले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना ३० हजार करोड आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना ९०० करोड रुपये मिळाले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
‘मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार’
मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला निर्धार
देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर विश्वास असून पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यवतमाळमध्ये आज जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींबद्दल गौरवोद्गार काढले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मोदी एक नाव नाहीतर राष्ट्रभक्ती आहेत. मोदी म्हणजे विकास आणि यशाचा मंत्र आहेत. मागील चार दिवसांपासून मोदींच्या नेतृत्वाखाली विकासकामांसह राज्यातील विविध कामांचे लोकार्पण होत आहे, मोदींचे महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे, त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. महाराष्ट्राच्या भूमीत मोदींचे स्वागत करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसचे मोदी देशाच्या सुवर्णकाळातले शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
देशातील महिलांना नमो महिला सक्षमीकरण योजनेचा ५५ लाख लाभ मिळाला आहे. मोदींच्या योजनेमुळे महिलांच्या जीवनात क्रांती घडत आहे. इंडिया फर्स्ट हा मोदींचा अजेंडा असून मागील १० वर्षांत मोदींनी एकदाही सुट्टी घेतलेली नाही, त्यांनी राष्ट्राला आपले जीवन अर्पण केले आहे “अब घर घर मोदी, मन मन मोदी” असा नाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.