Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीPM Modi : आई-बहिणीवरून शिव्या देऊ नका, नशेपासून दूर रहा

PM Modi : आई-बहिणीवरून शिव्या देऊ नका, नशेपासून दूर रहा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युवकांना सल्ला

नाशिक : आज भारत जगातील टॉप पाच अर्थव्यवस्थेमध्ये आहे. ही भारताच्या युवकांची ताकद आहे. आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे. तरुणांनो, स्थानिक वस्तूंचा जास्तीत वापर करा. देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने सशक्त आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल, हा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नाशिक येथील २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मराठीमधून राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीने छत्रपती शिवरायांना, रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाईंना घडवले. अशी महापुरूषांची जोशपूर्ण उदाहरणे देत तरुणांनी असे काम करा की, पुढील काळातील पिढी तुमची न चुकता आठवण काढेल, असे आवाहन करत मोदींनी युवकांना मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आणि आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असा मोलाचा सल्ला दिला. तसेच देशातील युवकांना स्थानिक उत्पादने वापरण्याचाही सल्ला दिला आहे.

२२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहिम राबवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी याआधीच केले आहे. त्यानुसार काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर हाती झाडू घेत स्वच्छता केली.

स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी युवकांसोबत नाशिकमध्ये आहे हे माझे सौभाग्य आहे. आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी नमन करतो. केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या भूमीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारख्या वीरमातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर यांच्यासारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. मी नारीशक्तीला कोटी कोटी वंदन करतो. याच धरतीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर सपूत दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिर व्यवस्थापकांना माझी विनंती आहे की, भव्य रामाच्या उभारणीसाठी १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवसापासून देशभरातील २२ जानेवारीतील सर्व तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहीम राबवावी. प्रभू राम पंचवटीत वास्तव्यास होते. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. मी या भूमीला वंदन करतो. काळाराम मंदिरात येण्याची आणि स्वच्छता करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा.

महाराष्ट्रातील युवकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आजचा दिवस युवाशक्तीचा दिवस आहे. भारतातील युवक सामर्थ्यशाली आहे. देशातील युवकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आपल्या युवा वर्गाकडे आहे. आत्ताची पिढी सर्वात भाग्यवान पिढी आहे. युवकांच्या परिश्रमामुळे जगभरात आपले स्वकार्याने आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरात लिहा. देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. येत्या कालखंडात तुम्ही असे काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील.

आजही आपण सर विश्वेश्वरैया यांच्या आठवणीत इंजिनिअर दिवस साजरा करतो. त्यांनी जे बाराव्या शतकात इंजिनिअरिंग कौशल्य दाखवलं ते आजही लाजवाब आहे. आजही आपण मेजर ध्यानचंद यांची जादूई हॉकीच्या प्रेमात आहोत. आजही आपण भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद यांचे पराक्रम विसरलो नाहीत. आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहे. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महान व्यक्तींनी देशासाठी आयुष्य वेचलं. हे सर्व जगले ते फक्त देशासाठी, स्वप्न बघितले ते देशासाठी, संकल्प केले ते सुद्धा देशासाठी. या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली.

आमच्या सरकारने १० वर्षात युवकांना व्यासपीठ देण्याचे प्रयत्न केला. योजनांच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सरकारच्या काळात आम्ही तीनपट काम केले आहे. युवकांसाठी नवी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक शिक्षणासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. भारतातील विमानतळे ही जगातील मोठ्या विमानतळइतरकी सक्षम आहेत. चांद्रयान आदित्य एल १ चे यश जगासमोर आहे. युवकांना त्यांची स्वप्न मोठी करण्याचा काळ आहे. यासाठी युवकांना त्यांची आव्हानं निश्चित करावी लागली. भारताला आत्मनिर्भरता सिद्ध करायचे आहे. भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायची, हे आपले लक्ष्य आहे. जगभरात भारताचे नाव अभिमानाने घेतली जातेय. महासत्ता म्हणून भारत नावारुपास येत आहे. त्यामुळे पुढील २५ वर्ष तुमच्यासाठी कर्तव्यकाळ आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत युवकांचा मोठा सहभाग आहे.

देशाची युवा पिढी तयार होत आहे, गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे. आता युवा पिढी म्हणते विकास आणि विरासत. सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. भारत ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात, तर परिवारवादाच्या राजकारणाला कमी कराल. परिवारवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसान केलंय. युवक आपल्या लोकशाहीत उर्जा आणू शकतील. युवकांनी मतदार यादीत नाव आल्यानंतर देशासाठी मतदान करावं. देशाचा अमृतकाळ हा परिवर्तनकाळ आहे.

कोरोनाकाळात जगाने भारताची ताकद बघितली. सर्व भारतीयांना वॅक्सीन देऊन त्यांना डिजीटल सर्टिफिकेट दिले. भारतात आज इतका स्वस्त मोबाईल डेटा उपलब्ध आहे, जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देशाचा मिजास युवा आहे आणि देशाचा अंदाजही युवा आहे. जो युवा असतो तो मागे हटत नाही, आघाडीवर असतो. आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत आघाडीवर नेतृत्व करत आहे. चांद्रयान, मेड इन इंडिया आयएनएस विक्रांत अशा योजनांमुळे भारताचा उर अभिमानाने भरुन येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांचे तीन मंत्र

  • मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा.
  • मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका.
  • आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -