पंढरपुर: गेल्या सोळा दिवसांपासून पंढरपुरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी २ जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सोळावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत.
संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी वडगाव मोरगाव मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून आज पारगावला मुक्कामी असणार आहे. सर्वच वारकऱ्यांना आता विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे.