मुंबई: गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात (kokan) जाणाऱ्यांची लगबग आता सुरू होईल. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे.
२७ ऑगस्टपासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच गणपतीच्या आधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यात पळसपे येथे इंदापूर महामार्गाला भेट दिली.
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार आज म्हणजेच २७ ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजल्यापासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, खालापूर येथील रस्त्यावरून अवजड वाहनांनी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या मार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम हा कळीचा मुद्दा बनला आहे. पनवेल येथे झालेल्या सभेदरम्यान मनसे नेते राज ठाकरे यांनीही या मुद्द्याला हात घातला होता. त्यानंतर मनसेकडून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीची तोडफोडही करण्यात आली होती.