भाजपा आमदार नितेश राणे यांचं खुलं आव्हान
मुंबई : ‘काल काँग्रेस पक्षाने (Congress) उबाठाला एक प्रस्ताव दिला की सांगली (Sangli Loksabha) किंवा भिंवडीची (Bhiwandi Loksabha) जागा देणं जमत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही? आणि ते ऐकल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली. अन्य वेळी उगाच छाती फुगवून दाखवायची, सुक्या धमक्या द्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये कशी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) हवा आहे, असं दाखवायचं. पण जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसशी फ्रेंडली फाईट करुन दाखवावी’, असं आव्हान भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलं. सांगलीच्या जागेवरुन मविआमध्ये बिघाडी झाली आहे, यावर भाष्य करताना नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र उपसलं.
नितेश राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचा बाणा जर खरंच उद्धव ठाकरेंमध्ये असेल, ते रक्त जर त्यांच्यात असेल तर त्यांनी काँग्रेससोबत सांगली आणि भिवंडीमध्ये फ्रेंडली फाईट करावी. घाबरतात कशाला? भीती कशाला वाटते? सांगलीमध्ये हा संजय राऊतला काँग्रेसला शिव्या देत फिरतोय, तिथे जर यांची काँग्रेससोबत फ्रेंडली फाईट झाली तर मी हा दावा करतो की उबाठाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल. आणि ते यांना चांगलंच माहित असल्यामुळे फ्रेंडली फाईटला ते घाबरतात, अशी टीका त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, संजय राऊतने कधी साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही, संजय राऊत ज्या भांडुप वॉर्डमध्ये राहतो तिथे उबाठाचा नाही तर वर्षानुवर्षे भाजपाचा नगरसेवक निवडून येत आहे. जो स्वतःच्या घराजवळ स्वतःचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही, तो प्रचाराच्या निमित्ताने मोठमोठ्या वल्गना करत सगळीकडे फिरतोय. काल त्याने सांगलीमध्ये वक्तव्य केलं, की ‘जर सांगलीमध्ये काँग्रेसने आमची कोंडी केली तर आम्ही त्यांची राज्यभरात कोंडी करु’. पण त्यांच्यात काँग्रेसची कोंडी करण्याची हिंमत आहे का? असेल तर दाखवावा तो बाणा. त्यामुळे उगाच सुक्या धमक्या देण्यापेक्षा मराठी चित्रपटाच्या डायलॉगप्रमाणे चड्डीत राहा आणि आपली लायकी ओळखा एवढंच सांगेन, असं नितेश राणे म्हणाले.
आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. ते येतील पण भाजपाने त्यांच्यावर आरोप केले होते तर भाजपा आता काय करणार? असं संजय राऊत म्हणाले. यावर नितेश यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, काँग्रेसचे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अनेक मोठ्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी प्रचाराच्या निमित्ताने मोठमोठे आरोप केले. त्यांना चपला मारण्याची भाषा केली. मग तरी जर ते तुम्हाला चालतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, तर तुम्हाला आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं नितेश राणे म्हणाले.