उबाठा संपवलेल्यांनी भाजप संपवण्याची भाषा करु नये
राऊतांच्या वक्तव्यांवर आमदार नितेश राणे यांची जोरदार टीका
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) पक्षावर टीका केली. ‘बाहेरच्या आमदार, खासदारांना भाजपात संधी दिली जाते. आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपवू’, अशी बेताल वक्तव्ये संजय राऊत यांनी केली. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘संजय राऊतच्या दहा पिढ्या जन्माला आल्या तरी देखील भाजपा संपू शकत नाही’, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या आमच्या प्रदेशाध्यक्षांना बाहेरुन आलेल्या लोकांना तुम्ही पदं देता, भाजपामध्ये बाहेरचे आमदार, खासदार निघून गेले तर मूळ ११० खासदार उरतील, अशी मुक्ताफळं संजय राजाराम राऊत सकाळी देत होता. मला यानिमित्ताने त्याला विचारायचंय की, तू कुठल्या तोंडाने आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर आरोप करतो? तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्याच्या मंत्रिमडळात जेवढे शिवसैनिक होते, त्यांच्यात मूळ आणि कडवे शिवसैनिक नेमके किती होते? तेव्हा तुला काँग्रेस, राष्ट्रवादी असे बाहेरचे सगळे चालायचे. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुझा मालक बसायचा.
राज्यसभेची खासदारकी द्यायची वेळ आली तेव्हा तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी आठवली, सिद्धीविनायक महामंडळ ठरवलं तेव्हा तुम्हाला आदेश बांदेकर आठवला. तुम्हाला अन्य शिर्डी संस्थानामध्ये कोणाला पाठवायचं असेल, तर तुम्हाला बाहेरचेच लोक आठवले. म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून याचं उद्धव ठाकरे आणि उबाठा उत्तम उदाहरण आहेत. मग कोणत्या तोंडाने तू आमच्यावर आरोप करतोस? अशी टीका नितेश राणे यांनी केली.
उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालं आहे
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता स्पष्ट कळलं आहे की, उद्धव ठाकरेंचं दुकान आता बंद झालं आहे. त्या दुकानात मालच उरलेला नाही. जे लोक आज भाजपमाध्ये प्रवेश करतायत ती काय लहान मुलं आहेत? त्यांना आपल्या भविष्याची चिंता नाही का? मग तुम्ही कुठल्या तोंडाने त्यांना थांबवताय? या देशात फक्त आदरणीय मोदी साहेबांचीच गॅरंटी चालते, हा विश्वास असल्यामुळेच आज मविआ आणि इंडिया अलायन्समधले असंख्य मोठ्यातले मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असं नितेश राणे म्हणाले.
मविआकडून प्रकाश आंबेडकरांना दिली जाते अपमानास्पद वागणूक
संजय राजाराम राऊत सकाळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत मानसन्मानाने राहावं, असं म्हणाला. पण माझ्याकडे माहिती आहे, की प्रकाश आंबेडकरजींनी जेव्हा मातोश्रीवर फोन लावला तेव्हा उद्धव ठाकरेंनी दोन वेळा त्यांचा फोनच उचलला नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंची लोकांचा अपमान करण्याची जुनी सवय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरच्या व्यक्तीसोबतही दिसून आली. एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे फोन घ्यायचे नाही, दुसरीकडे त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मविआच्या बैठकीबाहेर तासनतास बसवून ठेवायचं आणि मग मीडियासमोर आल्यानंतर त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळायची, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
संजय राऊताच्या दहा पिढ्या सुद्धा भाजपा संपवू शकत नाही
‘आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजपा संपवू’ या संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, जसं उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था झाली तसं तुम्ही करणार का? कारण आज उबाठा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ‘बी टीम’च आहे. त्यांना स्वतःचं अस्तित्व कुठे आहे? आणि स्वतः १०० टक्के संपलेल्या लोकांनी भाजपाला संपवण्याची भाषा करु नये. भाजपा ही आज भारताची ओळख झालेली आहे. भाजपा संपवण्यासाठी संजय राऊताच्या दहा पिढ्या जरी जन्माला आल्या तरी देखील ते शक्य होणार नाही.