ज्याचं संपूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे त्याने भाजपा आणि पंतप्रधानांवर टीका करणं हास्यास्पद
आमदार नितेश राणे यांचा घणाघात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अत्यंत असंबद्ध वक्तव्यं करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर तर गेल्या काही दिवसांत त्यांनी पातळी सोडून टीका केली. त्यामुळे भाजपा नेत्यांनी संजय राऊतांना चांगलंच टार्गेट केलं आहे. त्यातच आज तर ‘भाजपा आणि पंतप्रधान मोदींचे भ्रष्टाचाराने बारा वाजवले’, असं बेताल वक्तव्य संजय राऊतांनी केलं. देशाच्या पंतप्रधानांविषयी असं वक्तव्य करणार्या संजय राऊतांना भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खडे बोल सुनावले. ‘ज्याचं संपूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे त्याने भाजपावर टीका करणं हा मोठा विनोद आहे’, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, ज्याने स्वतःचे, स्वतःच्या मालकाचे आणि मालकाच्या पक्षाचे तीन तेरा वाजवले आहेत त्याने दुसर्यांचे बारा वाजवण्याची भाषा करणं हा २०२४चा मोठा विनोद आहे. आज उद्धव ठाकरेंकडे ना स्वतःचा पक्ष आहे ना स्वतःचं चिन्ह. ओसाड गावचे पाटील म्हणून ते राज्यभर फिरत आहेत, आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा म्हणजे हा भांडुपचा देवानंद, या दोघांनाही अशी भाषा करु नये.
पुढे नितेश राणे म्हणाले, मोदीसाहेबांबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कसे घराघरांत पोहोचणार आहेत, असं संजय राऊत सांगतो. ज्याचं स्वतःचं कुटुंब खिचडी घोटाळ्यात सामील आहे, कोविडच्या भ्रष्टाचारात याचा मालक आणि त्याचा मुलगा कधीही जेलमध्ये जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे, केजरीवाल भाग २ महाराष्ट्रात कधीही रिलीज होण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तीने मोदीसाहेब आणि भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरेने आजवर स्वतःच्या पैशाने फोनबिल, मोबाईल बिल भरलं नाही, गाडी घेतली नाही. त्याचं संपूर्ण आयुष्य हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. हे लोक जेव्हा दुसर्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तेव्हा त्यांना कळत नाही की लोक त्यांच्यावर हसत असतात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
संजय राऊत चारित्र्यहीन, त्याचे हात खुनाने बरबटलेले
संजय राऊतवर मी काही दिवसांपूर्वी व्यंकटेश उप्पर या व्यक्तीला गायब केल्याचा आरोप केला होता. तो व्यक्ती आजही गायब आहे आणि कालच वकोला पोलीस स्टेशनमध्ये तो हरवल्याची तक्रार डॉ. स्वप्ना पाटकर यांनी नोंदवली आहे. माणसांना गायब करणं, महिलांना शिव्या घालणं अशा चारित्र्याचा माणूस जेव्हा भाजप आणि पंतप्रधानांवर टीका करतो तेव्हा लोक याच्या शब्दांवर कुठेही विश्वास ठेवणार नाहीत.
मनसुख हिरेन, सुशांग सिंग राजपूत, दिशा सालियन, यानंतर आता व्यंकटेश उप्पर यांच्या कदाचित खुनाने यांचे हात बरबटलेले आहेत. भ्रष्टाचारांच्या पैशांनी यांचं आयुष्य चालतं. गांधी कुटुंबिय तर जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी गेल्या दहा वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्या मोदीसाहेबांसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीवर आरोप करण्याची हिंमत करु नये, असं नितेश राणे म्हणाले.
काँग्रेसच्या कोट्यावर नाचणारा बाजारु दलाल
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘तमाशातील नाचा’ असा शब्दप्रयोग केला. यावर नितेश राणे यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. नितेश राणे म्हणाले, काँग्रेसच्या कोट्यावर नाचणार्या बाजारु दलालांनी दुसर्यांना नाचा बोलू नये. संजय राऊतसारखे दलाल बाजारात खूप उपलब्ध आहेत. त्यामुळे दुसर्यांना नाचा बोलण्याआधी तू आधी राजकीय दलाल आहेस, हे लक्षात घे, असं नितेश राणे म्हणाले.
विनायक राऊतांनी राणे साहेबांवर बोलण्याची हिंमत करु नये
ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी नारायण राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये काय दिवे लावले, असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, तुम्ही एकटे आरोप करु नका. राणेसाहेबांनी सिंधुदुर्गसाठी काय दिलं, काय नाही दिलं याचा हिशोब आम्ही खुल्या व्यासपीठावर मांडायला तयार आहोत. शिवाय किती विकासकामांना अडवण्याचं काम तुम्ही तुमच्या पत्रांतून केलं ती पत्रं आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये प्रदर्शनासाठी लावणार आहोत. प्रकल्पाचा, विकासनिधीचा विरोध करणार्यांनी राणे साहेबांवर बोलण्याची हिंमत करु नये, असं नितेश राणे म्हणाले.