उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे भगव्याला लागलेले सगळ्यांत मोठे कलंक
आमदार नितेश राणे यांची जहरी टीका
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर (BJP) अनेक आरोप केले. अजितदादांची (Ajit Pawar) स्क्रिप्ट आणि एकनाथ शिंदेजींची (Ekanth Shinde) स्क्रिप्ट ही भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट आहे, एकाला हरवता येत नाही तर त्याचं घर फोडा, पक्ष फोडा अशी कार्यपद्धती भाजपाची आहे. भाजपाची कार्यपद्धती ही तालिबानसारखी आहे, असं ते म्हणाले. यावर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘संजय राऊत मुघलांच्या वंशजांमध्ये जन्मलेला आहे’, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे म्हणाले, संजय राजाराम राऊत हा मुघलांच्या वंशजांमध्ये जन्मलेला आहे. जसं औरंगजेब आणि मुघल आपापल्या घरांमध्ये आपल्या आईवडिलांची, भावंडांची, मुलांची कोण कत्तल करायचं, कोण त्रास द्यायचा, कोणाचा आयुष्य बरबाद करायचा, त्या तालमीतला हा संजय राऊत आहे. जेव्हा हा भाजप आणि संघावर टीका करतो की अजितदादांची आणि एकनाथ शिंदेजींची स्क्रिप्ट ही भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट आहे, तर मग संजय राऊतला आठवण करुन देईन की आदरणीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी प्रितेश नंदी यांना जेव्हा खासदारकी दिली तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना मी बरबाद करीन, कामाला लावीन असं संजय राऊत का म्हणाला? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
घराघरांमध्ये, भावंडांमध्ये भांडणं लावणारा संजय राऊत खरा शकुनीमामा
पुढे ते म्हणाले, संजय राऊतला स्वतःला २०१९ ला मुख्यमंत्री बनायचं होतं त्यासाठी शरद पवार साहेबांना पायघड्या घातल्या होत्या आणि जेव्हा आमदारांना फोन करायला सुरुवात केली आणि याला कळलं की हा मुख्यमंत्री बनत नाही आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनतोय, त्या दिवसापासून आजपर्यंत उद्धव ठाकरेच्या घरात काड्या कोणी लावल्या? जे काही अजितदादा आणि पवारसाहेबांच्या घरात होतंय तो २०१९चाच राग आहे. दुसर्या बाजूला ठाकरेंच्या घरात तेजस आणि आदित्यमध्ये जे काही सुरु आहे त्याचा मुख्य सूत्रधार देखील संजय राऊतच आहे. घराघरांमध्ये, भावंडांमध्ये भांडणं लावणारा तो खरा शकुनीमामा आहे, असा सणसणीत आरोप नितेश राणे यांनी केला.
तर तुझं वस्त्रहरण करेन
काड्या लावणार्या संजय राऊतला यामुळे काल अजितदादांच्या भाषणानंतर सुखाची झोप लागली असेल, नाईन्टीचीही गरज भासली नसेल. त्यामुळे उगाच सकाळी उठून भाजपवर आणि आमच्या नेत्यांवर बोलणार असशील तर आतापर्यंत मी फक्त राजकीय बोललो आहे, अति झालं तर तुझ्या घरात महाभारतचा जो एपिसोड सुरु आहे, त्यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेईन आणि तुझं वस्त्रहरण करेन, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे भगव्याला लागलेले सगळ्यांत मोठे कलंक
भगवं आमचं रक्त आहे असं म्हणणार्या संजय राऊतांना नितेश राणे यांनी सणसणीत चपराक लगावली. ते म्हणाले, भगव्याच्या नावावर दलाली करणारा संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. संजय म्हणतो की जेलमध्ये पण भगवे कपडे घालून फिरत होता, पण जेलमध्ये काय कपडे घालावे लागतात याचे आम्हाला आतमधले फोटो काढावे लागतील. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे भगव्याला लागलेले सगळ्यांत मोठे कलंक आहेत, असं नितेश राणे म्हणाले.
नारायण राणेंची दोनच मुलं पण संजय राऊतची किती…
राणेंच्या मुलांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला होता. त्यावर नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, राणेंची मुलं कोण आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि त्यांची केवळ दोनच मुलं आहेत. पण संजय राजाराम राऊत हे आत्मविश्वासाने सांगू शकतात का की माझ्या दोनच मुली आहेत? पुढचं मला बोलायला लावू नका, असं नितेश राणे म्हणाले. यासोबतच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत नारायण राणे यांचं पूर्ण नाव घेतलं हा माझा मोठा विजय आहे, असंही नितेश राणे म्हणाले.