गृह मंत्रालयाचा खुलासा
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कपात केलेली नाही, असा खुलासा गृह मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात झाल्यासंबंधीचे प्रसारित झालेले वृत्त खोटे असल्याचेही यावेळी गृह मंत्रालयाने नमूद केले आहे.
शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे. सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये मोठी कपात करण्यात आली असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमांवर प्रसारित झाले होते. यात सुमारे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पोलीस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट कार आणि पायलट वाहन देखील कमी करण्यात आले आहे. याशिवाय मातोश्रीवरील एसआरपीएफची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे, असे या वृत्तामध्ये सांगितले होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra