जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होत असून भारताचे नंदनवन असलेल्या प्रदेशात सर्व पर्यटकांचे स्वागत आहे.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होत असून भारताचे नंदनवन असलेल्या प्रदेशात सर्व पर्यटकांचे स्वागत आहे. पर्यटकांनी आणि पर्यटन संस्थांनी काश्मीरमध्ये येण्यासाठी सज्ज व्हावे. काश्मिरी जनता तुमच्या स्वागतासाठी तयार आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीर यांनी केले. राजनाथ सिंह सध्या चार दिवसांच्या काश्मीर दौ-यावर आहेत.
येथील तणावाची परिस्थिती सुधारावी यासाठी विविध स्तरातील लोकांशी ते चर्चा करणार आहेत. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ म्हणाले, काश्मीरमध्ये शांतता नांदावी, यासाठी वर्षभरात पाच काय पन्नास वेळा जरी मला येथे यावे लागले, तरी मी येईन. आम्हाला जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवायचा आहे. राज्यातील या जटील प्रश्नासंदर्भात काही ठराविक लोकांशीच बोलायचे असे मी ठरवून आलेलो नाही. यासाठी मला राज्यातील सर्वांशी बोलायला आवडेल.
जम्मू-काश्मीरमधील ३५ अ कलमाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, सरकारने यापूर्वी आणि आताही या मुद्द्यावरून न्यायालयात जाण्यासाठी कधीही पुढाकार घेतलेला नाही. राज्य सरकारवरच याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना येथील सरकार काश्मीरी जनतेच्या भावभावनांचा विचार न करता कुठलेही पाऊल उचलणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार कटिबद्ध असून यासाठी पंतप्रधान विकास निधीच्या माध्यमातून १ लाख कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. भविष्यातही शक्य ती मदत पुरवण्यात येईल, असे आश्वासनही राजनाथ सिंह यांनी दिले.
[EPSB]
जर्मनीत अश्रुधुराच्या हल्ल्यात सहा जखमी
[/EPSB]