देशातील अप्रत्यक्ष कर रचनेत आमुलाग्र बदल घडवणारे वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) सोमवारी लोकसभेत ४४३ मतांनी मंजूर करण्यात आले.
जीएसटी घटना विधेयक (१२२ वी दुरुस्ती) वर आयोजित केलेल्या चर्चेत सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तृत भाषण केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील कर दहशतवाद थांबवण्याच्या दृष्टीने जीएसटी हे महत्वाचे पाऊल आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असून काळ्या पैशावर चाप लागणार आहे. अप्रत्यक्ष करात सुधारणा झाल्याने ग्राहक ख-या अर्थाने राजा बनणार आहे. हे विधेयक मंजूर होणे हा देशातील लोकशाहीचा विजय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जीएसटीचा मोठा फायदा मागास राज्यांना होणार आहे. उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असणा-या राज्यांचे जीएसटीमुळे नुकसान होईल. मात्र ते भरून दिले जाईल. ८ ऑगस्ट ही तारीख कर दहशतवादापासून मुक्त होण्याच्या मार्गातील एक पाऊल आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जीएसटीमुळे सर्व कर रद्द होणार असून भ्रष्टाचाराला आळा बसेल. ग्राहकांना आता प्रत्येक वस्तूचे योग्य बिल मिळणार असून तो राजा बनेल. यातून काळा पैशाची समस्या सुटणार असून नोक-या उत्पन्न होण्याचे प्रमाण वाढणार आहे, असे मोदी म्हणाले.
जीएसटीच्या मुद्दयावर आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रनीती ही ‘राजनीती’पेक्षा मोठी असली पाहिजे. आपण सर्व राजकीय पक्षांचे व राज्य सरकारांचे आभार मानतो. आता २९ राज्यांनी जीएसटीला मान्यता दिल्यानंतर आम्ही अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करू, असे मोदी म्हणाले.