Home महामुंबई नागोठणे: आदिवासीपाडय़ांत काळा पाऊस!

नागोठणे: आदिवासीपाडय़ांत काळा पाऊस!

0

विभागातील पूर्वेकडील आदिवासीपाडय़ांमध्ये शुक्रवारी दुपारी पाऊस पडताना पावसाच्या पाण्याबरोबर काळ्या रंगाचे रसायन खाली पडल्याचा प्रकार घडला आहे.

नागोठणे- विभागातील पूर्वेकडील आदिवासीपाडय़ांमध्ये शुक्रवारी दुपारी पाऊस पडताना पावसाच्या पाण्याबरोबर काळ्या रंगाचे रसायन खाली पडल्याचा प्रकार घडला आहे. हे रसायन नक्की कोठून आले याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी साचलेल्या काळ्या रसायनामुळे भातशेती तसेच भाजीपाला पीक नष्ट होईल, अशी भीती आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.

याबाबत संबंधित पाण्याची तसेच साचलेल्या फेसाची येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे पर्यावरण व जलतज्ज्ञ प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, आम्ही पाच चाचण्या केल्या असून त्यातील तीनमध्ये दोष आढळून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केलेल्या चाचणीत पाण्याचा रंग काळसर आढळून आला असून त्यात ६.०५ आम्ल गुणधर्मी पाणी असल्याचे दिसून येत आहे. शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेपेक्षा पॅरामीटरच्या टोटल सॉलीडमध्ये दूषित पाणी प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले आहे. डॉ. जाधवर यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पडलेला पाऊस आम्लयुक्त होता व काळ्या धुरांचा ढग पाण्याच्या ढगात मिसळल्याने पावसाबरोबर हा काळा धूर खाली जमिनीवर पडल्याने पाणी प्रदूषित झाले असे त्यांनी स्पष्ट केले. पाणी आम्लयुक्त असल्याने ते आरोग्यास घातक असून त्यातून मेंदू, श्वसन तसेच पोटाचे गंभीर आजार बळावतात असे त्यांनी सांगितले.

शहरापासून ५ किलोमीटर अंतरावरील पूर्वेकडील डोंगरावर वासगाव, कातकरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी,लाव्हाची वाडी आदी आदिवासीवाडय़ा आहेत. येथील आदिवासींचा भाजीपाला पिकवून विकण्याचा मुख्य व्यवसाय आहे, तर काही जण भातशेती करतात. शुक्रवारी दुपारी पाऊस पडल्याने सुरुवातीला उग्र वासाची दुगंर्धी आली व त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर पडलेले पाणी काळे असल्याचे निदर्शनास आले असे वासगाव येथे राहणारे पाटणसई ग्रा. पं. चे माजी सरपंच झिमाशेठ कोकरे, काशीनाथ हंबीर व इतर आदिवासी बांधवानी स्पष्ट केले.

साचलेल्या पावसाच्या पाण्याचा गाळ खाली बसल्यानंतर रसायनमिश्रित काळ्या रंगाचा थर खाली बसला असल्याने भातशेतीला ते धोकादायकच असून तयार झालेल्या भाजीपाल्याला सुद्धा याचा फटका बसणार असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडा, रामा बरतूड, चंद्रकांत हंबीर, कमलाकर बांगारा यांनी सांगितले. मोरू हंबीर, महादू निरगुडा, संतोष भला आणि आदिवासी महिलांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात सुद्धा एकदा असा पाऊस पडला होता. वांगी, शिराळी, कारली, मिरची, काकडी, पडवळ, भेंडी आदी भाज्यांचे पीक आम्ही घेत असून त्यावेळी पडलेल्या काळ्या पावसामुळे केलेले बहुतांशी पीक नष्ट झाले होते व प्रत्येक शेतक-याला २० ते ४० हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते असे त्यांनी स्पष्ट केले. या भागात फेरफटका मारला असता, ढोकवाडीतील ग्रामस्थांना त्याचा जास्त फटका बसला असल्याचे निदर्शनास आले आहे.

या गावालगत एक विहीर असून विहिरीच्या पाण्यावर सुद्धा काळ्या रंगाचा तवंग साचला असून उन्हाळ्यात यातील पाणी जलवाहिनीद्वारे परिसरातील आदिवासीवाडय़ांवर पुरवले जाते. पावसाळ्यात बहुतांशी कुटुंबे पावसाच्या पागोळीचे पाणी गाळून घरात वापरत असतात व उणीव भासल्यास संबंधित विहिरीचे पाणी आणत असतात असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी पाणी भरले असून आता सगळीकडेच काळे पाणी साचले असल्याने आमच्या मुलाबाळांसाठी आता पाणी तरी कोठून आणायचे, असा सवाल त्यांनी व्यक्त केला.

[EPSB]

अमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असे अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version