महापालिकेचा भर शाळा विलीनीकरणावर
मुंबई – मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी काय पण अशी ओरड नेहमीच शिवसेना करत असते. प्रत्यक्षात मात्र मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही मराठी शाळेचे अस्तित्व टिकवण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे. मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या पाच वर्षात शून्यावर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मराठी भाषेवरचे बेगडी प्रेम पुन्हा एकदा मुंबईकरांसमोर आले आहे.
मराठी प्रेमाचे भरते येणा-या मुंबई महापालिकेतील शिवसेनेला मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यात अपयश आले आहे. शिवसेना नेहमीच आपल्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी दुस-यावर खापर फोडते. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असल्याने अखेर विलीनीकरणाचा प्रस्ताव शिक्षण समितीत आणला आहे. मराठी शाळांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आणणे म्हणजे शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम दिसून येते.
आर-दक्षिण विभाग-महात्मा गांधी मराठी शाळा, पी-दक्षिण उन्नत मराठी शाळा, के-पश्चिम मुद्रण कामगार मराठी शाळा, के-पश्चिम येथील डी. एन. नगर मराठी शाळा, एच-पश्चिम येथील वांद्रे पेटीट मराठी शाळा या मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पाच वर्षात शून्यावर आली आहे. तर याच मराठी शाळांबरोबर उर्दु, तेलुगू, गुजराती या शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. पटसंख्येच्या कारणाने शाळा विलीनीकरणाचा प्रस्ताव शिक्षण समितीत मंजुरीसाठी सादर होणार आहे. शिक्षण समितीत शिवसेना आपली भूमिका बदल विलीनीकरणाचा प्रस्ताव परत पाठवणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे