९० टक्के आयएएस अधिकारी काम करत नसल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली- ९० टक्के आयएएस अधिकारी काम करत नसल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अधिका-यांच्या या कार्यशैलीमुळे विकास हा सचिवालयातच अडकला आहे, असे नेहमी वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. कंत्राटी कर्मचा-यांना नियमित करण्याला नोकरशहांनी विरोध दर्शवला आहे. दिल्लीला जर संपूर्ण राज्याचा दर्जा असता तर त्यांच्या सरकारने २४ तासांत सर्व कंत्राटी कर्मचा-यांना नियमित केले असते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
उर्जा विभागाच्या निवृत्त कर्मचा-यांच्या सत्कारानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केजरीवाल यांनी आयएएस अधिकारी विकासकामांशी संबंधित फायली अडवून ठेवतात असा आरोप केला. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अध्यक्ष या नात्याने कंत्राटी कर्मचा-यांना नियमित करण्याच्या प्रस्तावाचा हवाला देत ते म्हणाले, त्यांच्यातील (आयएएस) ९० टक्के लोक हे काम करत नाहीत, फायली थांबवून ठेवतात.
ते म्हणाले, जेव्हा मी कंत्राटी कर्मचा-यांना नियमित करण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा अधिका-यांनी माझा विरोध केला. मी म्हणालो, जर हाच तर्क लावायचा असेल तर सर्व आयएएस अधिका-यांनाही कंत्राटी केलं पाहिजे कारण ते कामच नाही करत. उर्जा विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांना कॅशलेस आरोग्य सुविधांच्या संदर्भात ते म्हणाले की, काही अधिकारी या योजनेत खोडा घालत होते, हे मला समजलं आहे. मला अनेकवेळा असं वाटतं की, विकास हा सचिवालयातच अडकला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मी श्रम विभागाला यासंबंधीची अधिसचूना नायब राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यास सांगितले आहे. जर त्यांनी हा प्रस्ताव रोखला तर ते (कंत्राटी कर्मचारी) अडचणी निर्माण करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
[EPSB]
[/EPSB]