छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या कर्जमाफीची सुरुवात बुधवारपासून होणार असून पहिल्या दिवशी राज्यातील दहा लाख शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या कर्जमाफीची सुरुवात बुधवारपासून होणार असून पहिल्या दिवशी राज्यातील दहा लाख शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. उर्वरित कर्जमाफीची रक्कम एक महिन्याच्या आत संबंधित बँकांच्या खात्यात जमा होईल, असेही ते म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीसाठी ७७ ते ८० लाख शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बुधवारपासून प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँका कर्जमाफीचे पैसे लाटूच शकणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुधवारी पहिल्या दिवशी १० लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना लाभ मिळेल. पुढे दररोज २ ते ५ लाख खाती सेटल केली जातील. २५ ते ३० दिवसांत ८० टक्के प्रक्रिया पूर्ण होईल. उर्वरित २० टक्के शेतक-यांच्या अर्जात ज्या त्रुटी आहेत, त्याची सुनावणी होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँका मागच्यावेळेप्रमाणे यंदा कर्जमाफीचे पैसे लाटू शकणार नाहीत. पूर्वी बँका राईट ऑफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही. याशिवाय गावाकडील शेतीवर ज्यांनी मुंबईत कर्ज घेतले आहे अशा ख-या शेतक-यांना कर्जमाफी मिळेल. मात्र कोणत्याही खोटय़ा शेतक-यांना कर्जमाफी मिळणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी केल्याने ३ हजार कोटींची तूट सहन करावी लागणार आहे. मात्र महसूल वाढवण्यासाठी काही नवीन उपाय योजना करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना दहा लाख रुपये, तर यवतमाळ येथे फवारणी करताना मृत्यूमुखी पडलेल्यांना दोन लाख, असा भेदभाव का, असे विचारले असता एल्फिन्स्टन दुर्घटनेत थेट सरकारचा संबंध होता. यवतमाळबाबतही सरकार आपली जबाबदारी झटकत नाही. पण अशा घटनांत पूर्वी एक लाख रुपये मिळत होते. आता राज्य सरकार दोन लाख आणि केंद्र सरकारचे दोन लाख असे एकूण चार लाख रुपये मृत शेतक-यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
[EPSB]
[/EPSB]