जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची चाळण केली.
डोंबिवली- ऑगस्ट महिन्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने शहरातील रस्त्याची चाळण केली म्हणून या रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी सिमेंट खडीचे मिश्रण टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्याची प्रक्रिया करण्यात आली, पण पावसाने काही काळ उसंत घेतल्याने आता ही टाकलेली खडी धुळीच्या रूपात वाहनचालकांच्या नाकातोंडात जात आहे. अनेक ठिकाणी भरधाव वाहनांमुळे ही धूळ इतरत्र ठिकाणी उडू लागल्याने सध्या धुळीचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळत आहे. जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची चाळण केली. यात शहरातील सर्वच रस्त्यांना मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले तसेच ह्या खड्डय़ांमुळे काही नागरिकांना जीव ही गमवावे लागले.
पण पावसाने विश्रांती घेताच आता जागोजागी पसरलेल्या चिखलाचे धुळीत रूपांतर झाले आहे. पालिकेने त्यात सिमेंटमिश्रित खडी टाकून खड्डे बुजवले होते. खड्डे भरण्यासाठी करण्यात आलेली ही मलमपट्टी पावसानंतर निकृष्ट ठरली आहे. याचा सर्वात मोठा फटका छोटी वाहने आणि दुचाकीस्वारांना बसत आहे. ही टाकण्यात आलेली खडी ही वाहनांच्या वेगाने उडते, तसेच यावरून भरधाव वेगाने जाणा-या वाहनांमुळे खडीची बारीक पेस्ट होऊन धुळीचे धुके तयार झालेले ही पाहावयास मिळत आहे. पूर्वेतील टिळक चौक ते घरडा सर्कल, तसेच पेंढारकर कॉलेज ते दावडी नाका ह्या परिसरात सर्वात जास्त वाहतूक असून ह्या ठिकाणी करण्यात आलेले हे काम नागरिक तसेच दुचाकी स्वरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
[EPSB]
महाराष्ट्रात धोका असल्याचा अबू सालेमचा दावा
१
[/EPSB]