महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी संपुष्टात आली होती. त्यानंतरच्या १९१ नगर परिषद निवडणुकीतही या दोन्ही पक्षांची आघाडी होऊ शकली नाही.
२५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करूनच निवडणुका लढवाव्यात यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून मोठय़ा प्रमाणात नेत्यांवर दबाव वाढत असून आघाडी केली नाही, तर नगर परिषदेप्रमाणेच मोठय़ा प्रमाणात पराभव होण्याची शक्यता आहे.
कारण मतविभागणीचा फायदा भाजपाला मिळत आहे, हे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. त्यामुळे जागावाटपाचे प्रश्न फार प्रतिष्ठेचे न करता भाजपा-सेनेचा पराभव करण्यासाठी आघाडी करण्याचे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदवली आहे.
तसेच काँग्रेस पक्षातूनही आघाडी करण्याचा आग्रह धरला जात आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हा परिषदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यामुळे आघाडी गरजेची ठरेल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.