पंतप्रधान मोदी सरकारवर देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटल्याचा आरोप होत असताना, भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत २४ व २५ सप्टेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होणार आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान मोदी सरकारवर देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटल्याचा आरोप होत असताना, भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत २४ व २५ सप्टेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होणार आहे. देशाची आर्थिक परिस्थिती व गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका यांवरही मंथन होणार आहे. गुजरात भाजपाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. जे ठराव तिथे होतील, त्यापैकी आर्थिक प्रस्तावात नोटाबंदी आणि जीएसटी अर्थव्यवस्थेसाठी कशाप्रकारे हिताचे आहे, ते सांगण्याचा प्रयत्न होईल. महिला आरक्षण आणि रोहिंग्या शरणार्थी या मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची विस्तारित बैठक राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर सोमवारपासून सुरू होत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन तसेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमुळे या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. सामान्यपणे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला १२० सदस्य तसेच तेवढेच निमंत्रित असे जवळपास २५० सदस्य उपस्थित राहात. मात्र, यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीची विस्तारित बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला पक्षाचे सर्व केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिका-यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही संख्या दोन हजाराच्या घरात राहणार असल्याचे समजते. ही बैठक सोमवारी दुपारी तीन वाजता होणार आहे.
या बैठकीचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणाने होणार असून समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या बैठकीत राजकीय आणि आर्थिक विषयांवरील दोन प्रस्ताव पारित केले जाणार असल्याचे समजते. राजकीय प्रस्तावात रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्याचा समावेश राहण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रस्तावात जीएसटीसह देशातील सद्य आर्थिक स्थितीचा समावेश केला जाणार आहे. राजकीय प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्र्बुद्धे आणि भाजपा महासचिव राम माधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बैठकीला भाजपाचे २८१ लोकसभा सदस्य, ५७ राज्यसभा सदस्य आणि १४०० आमदार उपस्थित राहणार आहेत.
भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वषार्चा समारोपही या बैठकीच्या निमित्ताने होणार आहे. भाजपाच्या दिल्ली प्रदेशाकडे या बैठकीची जबाबदारी सोपवण्यात आली असून बैठकीच्या तयारीवर राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, महासचिव कैलास विजयवर्गीय लक्ष ठेऊन आहेत. झेंडे तसेच पोस्टर आणि बॅनरने स्टेडियमचा परिसर सजवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अमित शाह आदी कटआऊट या परिसरात लावण्यात येत आहे.
[EPSB]
[/EPSB]