आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या वैयक्तिक निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपयांवर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
पश्चिम बंगालचे सह मुख्य निवडणूक अधिकारी सायबल बर्मन यांनी ही माहिती दिली. २०११ मध्ये याबाबतचा निर्णय झाला होता. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होणार आहे.
नवीन निर्णयावर अनेक पक्ष नाखूश असून त्यांनी ही मर्यादा पुन्हा वाढवण्याची मागणी केली आहे, असे निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्चविषयक स्पेशल ड्युटी ऑफिसर अमित रॉय चौधरी यांनी सांगितले.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने अधिक कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसाठी भरारी पथक, सांख्यिकी भरारी पथक, व्हिडीओ भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे. ही सर्व पथके खर्च निरीक्षकांच्या अखत्यारित काम करतील, असे रॉयचौधरी यांनी सांगितले.