मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये होरपळत असलेल्या सहारणपूरमध्ये परिस्थितीत थोडी सुधारणा दिसून आल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी चार तासासाठी संचारबंदी शिथिल केली आहे.
नव्या सहारणपूरमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन तर, जुन्या शहरांमध्ये दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. संचारबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षापथकांना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे जिल्हा न्यायादंडाधिकारी संध्या तिवारी यांनी सांगितले.
या हिंसाचारामुळे शहरामध्ये अफवांचे पीक आले असून, रविवारी रात्री अनेकांनी प्रशासनांशी संपर्क साधून विविध घटनांबद्दल विचारणा केली मात्र ९६ टक्के घटना या अफवा होत्या असे तिवारी यांनी सांगितले. शनिवारी सहारणपूरमध्ये दोन गटात जमिनीच्या वादावरु जोरदार हाणामारी झाली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर १९ जण जखमी झाले. जखमींमध्ये पाच पोलिस, शहर दंडाधिकारी आणि १३ इतर जणांचा समावेश आहे.