Home टॉप स्टोरी देशात हिंदू दहशतवाद असल्याचे ‘सनातन’ला मान्य

देशात हिंदू दहशतवाद असल्याचे ‘सनातन’ला मान्य

0

कॉम्रेड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड हा निर्दोष आहे, असा दावा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. 


मुंबई- देशात हिंदू दहशतवाद असून हिंदू धर्माच्या विरोधात बोलल्याने कॉ. गोविंद पानसरे आणि कर्नाटकातील साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या हिंदूंनी केली असावी, असा गौप्यस्फोट हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी शुक्रवारी ‘सनातन’ संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

देशात हिंदू दहशतवाद असल्याचे आम्ही मान्य केले आहे. यासाठी काही संघटना सामील असल्या तरी आम्ही त्यात सहभागी नाही, असा खुलासा त्यांनी केला. मात्र या भटकत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत कुठे तरी चर्चा व्हावी, असा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

पानसरे यांच्या हत्येत आमचा साधक समीर गायकवाड याला पकडण्यात आले असले तरी तो निर्दोष आहे. पुरोगामी संघटनांच्या दबावामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असून आम्ही समीरच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे ‘सनातन’ने सांगितले.

कॉ. पानसरे, दाभोलकर यांच्या हत्येविषयी आमचे साधक निरपराध असतानाही त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. समीर धर्मरक्षणावर काम करत असताना विशिष्ट व्यक्तीसोबत का बोलतो हे लक्ष ठेवून पोलिसांनी केलेली कारवाई चुकीचे असल्याचा दावाही ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला.

आमची संस्था काय करते हे न तपासता त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जाते, परंतु आम्ही सरकारला पानसरे आणि दाभोलकरांच्या हत्येसंदर्भात जो पत्रव्यवहार केला आहे, त्याची उत्तरे आम्हाला का दिली नाहीत,असा सवालही पुनाळेकर यांनी केला. तर गायकवाड यांच्या पाठीशी सनातनसोबतच हिंदू जनजागृती समितीही असल्याचे समितीचे प्रवक्ते डॉ. उदय पुरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कॉ. पानसरे यांनी आणि दाभोलकर यांच्या हत्यांशी ‘सनातन’चा काहीही संबंध नाही. पानसरे यांचे तेथील लँडमाफिया आणि टोलमाफियांच्या विरोधात वैर होते, तर दाभोलकर यांच्या संस्थेत अनेक गैरप्रकार घडल्यानेच ही हत्या झाली असल्याचा कयास पुनाळेकर यांनी लावला. यासाठी आपण सरकारला अनेक पुरावेही आणि माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी आमचा जबाब नोंदवला नसल्याचेही ते म्हणाले.

कलबुर्गीला हिंदूने मारले

कलबुर्गी यांनी हिंदूच्या मूर्तीसंदर्भात जे विधान केलेले होते, त्यावरून त्यांची हत्या ही हिंदूनीच केली असावी मात्र त्याचे समर्थन करत नाही. मात्र जे लोक धर्माच्या विरोधात बोलतात, त्यांच्याविरोधात राग येतो. त्यामुळेच कपिल पाटील, अनंत पटवर्धन यांच्या वक्तव्याबद्दलही राग येतो, त्यामुळे माथी भडकतात, असेही पुनाळेकर म्हणाले.

पटवर्धनला धमकी

दरम्यान, राम मे नाम, कॉम्रेड जयभीम, मुंबई मेरी जान या माहितीपटाचे निर्माते आनंद पटवर्धन या पत्रकार परिषदेला हजर होते, त्यांना पत्रकार परिषदेतच ‘सनातन’कडून धमकी दिली. त्यासोतच कपिल पाटील यांचाही उल्लेख केला.

पत्रकारांनी आपण या दोघांनाही अप्रत्यक्षा धमकीचा इशारा देता काय असे विचारले असताना त्यावर पुनाळेकरांनी सारवासारव केली. तर ठाणे गडकरी रंगायतन येथे आपल्या कार्यकर्त्यांनी जो बाँबब्लास्ट केला त्यांचा हेतू वाईट नव्हता तर ते नाटक थांबवायची त्यांची भूमिका होतील, असा दावाही ‘सनातन’ने केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version