आतंकवाद स्थापित करू पाहणा-या सनातन संस्थेवर सरकारने तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी जिल्ह्यातील सामाजिक, परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिका-यांमार्फत एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.
देशातील विवेकवादी विचारांची आणि विचारवंतांची हत्या इथल्या सनातनी विचारांनीच केली आहे. धर्माधतेचा कट्टर पुरस्कर्ता असणा-या आणि साधकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणा-या सनातन संस्थेच्या एका साधकाला कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ‘डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रा. श्याम मानव यांनी केली’ अशी वल्गना करत नवा वाद निर्माण केला आहे.
सनातनच्या या वक्तव्याचाही जाहीर निषेध या निवेदनाद्वारे सर्व परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. सामाजिक संघटनांच्या संयुक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक मडावी यांनी स्वीकारले. तर संघटनांद्वारे प्राप्त निवेदन सरकारकडे पाठवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी या वेळी सांगितले.