श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने श्रीलंकन क्रिकेटच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन क्रिकेट मंडळात फेरबदल झाल्याने जयसूर्या यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण समितीनेच राजीनामा दिला आहे.
जयसूर्या यांच्या निवड समितीचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार होता. नव्या हंगामी समितीने मुदतवाढवून देण्यास नकार दर्शवल्याने जयसूर्या यांनी राजीनामा दिला. जयसूर्या यांच्या निवड समितीचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपला होता. मात्र श्रीलंकन क्रिकेट मंडळाची निवडणूक लांबणीवर गेल्याने आणखी महिन्याभराचा कार्यकाळ मिळाला होता.
निवड समितीमध्ये मला जी संधी मिळाली त्याचा मला अभिमान असून, मी आनंदी आहे. भविष्यात श्रीलंकन क्रिकेटला माझी गरज लागली तर मी उपलब्ध आहे असे जयसूर्या यांनी क्रीडा मंत्री नवीन दिसनायके यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी केलेल्या संघ निवडीवरुन जयसूर्या यांच्यावर जोरदार टिका झाली होती.