सरकारने सर्वच योजनांसाठी ‘आधारकार्ड’ सक्तीचे केले असले तरी, आधारकार्ड नसल्याने आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
ग्रामीण भागात आधारकार्ड केंद्र विभागात ठेवण्यात आले होते. त्या वेळी जन्माचा पुरावा, रेशनिंग कार्ड, फोटो आयडी इत्यादी सक्तीचे केल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिक या कार्ड नोंदणीपासून वंचित राहिले होते. आता नव्याने नागरिकांनी मोठय़ा प्रयासाने फोटो पुरावे मिळवले असले तरी सध्या आधार नोंदणी केंद्र बंद झाल्याने अशा नागरिकांना आधार कार्ड मिळणे दुरापास्त झाले आहे. आधारकार्ड नसल्याने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील नागरिकांना सरकारच्या विकास योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आधार केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
शहापूर येथे असलेले अधार केंद्र कसारा दुर्गम भाग, खर्डी दुर्गम भाग, टाकीपठार, डोळखांब येथून सुमारे ४० किमी इतक्या अंतरावर असल्याने आपली रोजंदारी सोडून इकडे येणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यामुळे कसारा,खर्डी, अघई, डोळखांब, साकडबाव, टाकीपठार, शेई-शेरा आदी भागांत किमान काही दिवस आधार केंद्र सुरू करून वंचितांना आधार मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.