मुंबईत भरलेल्या साठाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, रणांगणकार विश्राम बेडेकर यांचा आज जन्मदिन. दि. १३ ऑगस्ट १९०६ रोजी अमरावतीला जन्मलेले विश्वनाथ तथा विश्राम बेडेकर हे मराठीतील नामवंत कादंबरीकार होते. रणांगण ही त्यांची कादंबरी मराठी साहित्याचा मानदंड समजली जाते. चिंतामणराव कोल्हटकर, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासह बेडेकरांनी बलवंत नाटक मंडळी सांगलीला स्थापन केली. बलवंतने मराठी रंगभूमीवर एक नवे पर्व निर्माण केले. अनेक चित्रपटकथा, नाटकांतून विश्राम बेडेकर रसिकांना भेटत राहिले. संगीत ब्रह्मकुमारी हे नाटक, पहिला पाळणा, अमर भूपाळी, रामशास्त्री, शेजारी अशा चित्रपटांचे हे कथाकार, दिग्दर्शक! आपल्या बेडेकर प्रोडक्शन्स्मार्फत लक्ष्मीचे खेळ, ठकीचे लग्न असे चित्रपट देणा-या बेडेकरांनी लाखाराणीचे दिग्दर्शन केले. टिळक आणि आगरकर हे त्या दोघांच्या मैत्री आणि भांडणामागची कहाणी सांगणारे नाटक लिहिले. चित्र-नाटय़सृष्टीचा हा स्वच्छंद रहिवासी. माणसाचे एक मन जीवनाभुव घेते, तर दुसरे मन त्याचे विश्लेषण करते. त्या चिंतनशील मनाने सांगितलेली, मराठी साहित्यविश्वात अनोखी ठरलेली आत्मकथा एक झाड, दोन पक्षी लिहिणारे हे विश्राम बेडेकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपटाची पटकथा लिहिणारा हा प्रतिभावंत दि. ३० ऑक्टोबर १९९८ रोजी आपल्यातून निघून गेला. आज त्यांचा जन्मदिन.