पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणूकीची ‘सेमी फायनल’ मानल्या जाणा-या पाच राज्यातील निवडणूकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली.
या पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल आठ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत.
या राज्यांमध्ये होणार ‘सेमी फायनल’
या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना प्रथम उमेदवार नाकारण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७०, मध्य प्रदेश विधानसभेच्या २३०, राजस्थान विधानसभेच्या २००, छत्तीसगड विधानसभेच्या ९० तर मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठी निवडणूका होत आहेत.
या पाच राज्यातील ६३० विधानसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ११ कोटी मतदार मतदान करतील.
या निवडणुकांमध्ये मतदारांना प्रथमच नकारमताचा (एकही उमेदवार पसंत नसल्यास ‘यापैकी कोणी नाही’ हा पर्याय) वापर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
पेड न्यूजचा सुळसुळाट रोखण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच जागरूकता निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या व्यवस्थापनावर देखरेख आणि निवडणुकीमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी हे निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असल्याचे संपत यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यासाठी ११ तर दुस-या टप्प्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर अन्य चार ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
विधानसभेच्या २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशमध्ये २५ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर राजस्थानमध्ये २०० जागांसाठी एक डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. दिल्ली आणि मिझोराममध्ये चार डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहेत तर मिझोराममध्ये ४० जागांसाठी मतदान होणार आहे.
गुजरातमधील सुरत आणि तामिळनाडूमधील यरकौड विधानसभेसाठीची पोटनिवडणूक चार डिसेंबर रोजी होणार आहे.
२००८मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम या राज्यात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते.
या पाच राज्यातील निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल ६० हजार सुरक्षा जवानांची गरज लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
[EPSB]
या राज्यांमध्ये होणार ‘सेमी फायनल’
लोकसभा निवडणुकी पूर्वी होणा-या पाच राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल…
[/EPSB]