गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तसेच गंभीर गुन्हे असलेल्या निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्यासाठी आता केंद्रीय निवडणुक आयोगाने पुढाकार घेतला आहे.
ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत तसेच ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना चूकीची माहिती दिली आहे त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवावे अशी शिफारस आयोगाने कायदा मंत्रालयाकडे केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या लोकप्रतिनिधींना कोणत्याही न्यायालयाने शिक्षा सुनावली असता त्याच क्षणी त्याचे प्रतिनिधीत्व रद्द होते. मात्र आता निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार केले जाणार आहे.
ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे आणि ज्यामध्ये किमान पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते अशा उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून बंदी घालण्यात यावे अशी शिफारस कायदा मंत्रालयाकडे करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी सांगितले. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या सहा महिने आधी तर एखाद्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले असले तर त्याला निवडणूक लढवण्यापासून अपात्र करावे अशीही शिफारस आयोगाने केल्याचे संपत म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या समितीने आपल्या शिफारसी कायदा मंत्रालयाकडे पाठवल्या आहेत. यावर कायदा आयोग काम करेल असेही ते म्हणाले.