मुंबईत १९९३मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख दोषी याकूब अब्दुल रझाक मेमनची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली.
फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जावा, अशी याचिका मेमनने दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. आर. दवे, जे. चेलामेश्वर आणि कुरियन जोसेफ यांच्या पीठाने मेमनची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मेमनच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रपतींनीही यापूर्वी मेमनचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता.
मी गेल्या २० वर्षापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. जन्मठेपेच्या १४ वर्षाच्या शिक्षेपेक्षाही ही अधिक शिक्षा असल्याचे मेमनने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मेमनला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी १९९४ मध्ये अटक झाली होती.
२००७मध्ये टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. याकूबवर हल्ल्याचा कट रचणे, हल्ला करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे यांसह विविध गुन्ह्यांतर्गत आरोप दाखल करण्यात आले. त्यानंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टाडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.
न्यायालयाच्या या निर्णयावर मेमन याने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती. अखेर राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळून लावत मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे २५० जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.