मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील सहभाग वारंवार नाकारणा-या पाकिस्तानला त्यांच्याच अधिका-याने उघड पाडल आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला गेला आणि हल्ला करणारे दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे होते असे पाकिस्तानच्या तपास यंत्रणेचे माजी महासंचालक तारिक खोसा यांनी म्हटले आहे.
डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्रासाठी लिहीलेल्या लेखामध्ये खोसा यांनी ही कबुली दिली असून, त्यांनी पाकिस्तान सरकारने चूक मान्य करावी असे मत व्यक्त केले आहे.
न्यायाधीशांच्या बदल्या किंवा अन्य मार्गाने या खटल्याच्या सुनावणीमध्ये पाकिस्तानकडून जो वेळकाढूपणा केला जात आहे त्यावरही खोसला यांनी टीका केली. पाकिस्तान सरकारने आपली चूक कबूल करावी आणि या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या कारस्थानाकर्त्यांना शासन करुन या प्रकरणात न्याय करावा असे मत खोसला यांनी व्यक्त केले.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर खोसा एफआयए या पाकिस्तानी तपास यंत्रणेचे प्रमुख झाले होते. त्यांनीही मुंबई हल्ल्याच्या तपासाचे काम पाहिले आहे. सिंध प्रांतातील थट्टाजवळ लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांना मुंबई हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तेथूनच समुद्रमार्गे त्यांना भारतात पाठवण्यात आले असे खोसा यांनी म्हटले आहे.
मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेल्या स्फोटकांसारखीच स्फोटके आम्ही थट्टा प्रशिक्षण केंद्रातून जप्त केली होती तसेच पाकिस्तानातून निघाताना दहशतवाद्यांनी जी बोट वापरली होती ती बोट पुन्हा रंगरंगोटी करुन बंदरात आणून ठेवली होती ती बोटही आम्ही जप्त केली होती.
खोसा यांनी या लेखात पाकिस्तानच्या सहभागाचे सर्व पुरावे देऊन पाकिस्तानला उघड पाडल आहे. मुंबईवर झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पाप नागरीकांचा बळी गेला होता.