Home टॉप स्टोरी ‘मुंबई महापालिका बरखास्त करा’

‘मुंबई महापालिका बरखास्त करा’

0

मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा कहर झाला असून ही महापालिका तात्काळ बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.

मुंबई- मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा कहर झाला असून ही महापालिका तात्काळ बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.

निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यासाठी एक निवेदन देण्यात आले. मुंबई महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. शिवसेना-भाजपा मुंबई महानगरपालिका चालविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते केवळ एकमेकांवर आरोप करत आहेत.

मुंबई महानगरपालिकेतील रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा, डम्पिंग ग्राऊंड घोटाळा, टॅबलेट घोटाळा, असे अनेक घोटाळे बाहेर आले आहेत. पावसाळा तोंडावर असतानाही अजून मुंबईतील नाल्यांची सफाई झालेली नाही. यामुळे मुंबईकर निराश झालेले आहेत.

मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा देण्यात शिवसेना-भाजपा सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील हे सरकार ताबडतोब बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचे निरूपम यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांच्याही राजीनाम्याची मागणी

भाजपाचे मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप आणि त्यांचा कुविख्यात गुंड दाऊदशी असलेले संबंध तसेच पुणे येथील एमआयडीसी जमीन घोटाळा या सर्व प्रकरणात ते दोषी असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे व त्यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणीही आपण राज्यपालांकडे केली असल्याचे निरूपम म्हणाले.

या शिष्टमंडळामध्ये निरूपम यांच्या सोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार अस्लम शेख, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, वर्षाताई गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, अशोक जाधव, मनपा विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा तसेच मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version