‘झी मराठी’ वाहिनीवरील प्रसिद्ध ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे आता मुंबईमध्ये चित्रीकरण होत आहे. मायानगरी मुंबईमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव भन्नाट आहे, असे या मालिकेतील ‘राणा’ची भूमिका करणा-या हार्दिक जोशी याने सांगितले. ‘‘मुंबईमध्ये कोणाला वेळ नसतो. सगळे घडय़ाळय़ाच्या काटय़ावर चालतात. पण, जेव्हा आम्ही चित्रीकरण करत होतो, तेव्हा पाऊस असतानादेखील सर्वजण थांबून शूटिंग पाहत होते. अनेक चाहते भेटले. त्यांनी आमच्या कामाचे कौतुक केले. लोकल व रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शूट’ करतानादेखील तेथील प्रेक्षकांना एक सुखद धक्काच मिळाला. खुद्द राणाला समोर बघून सगळे स्थिरावले. मला पहिल्यांदा ‘कॅन्डिड’ शूटचा अनुभव आला. चाहत्यांची रेलचेल चालूच होती, पण त्यांना चित्रीकरणाचे गांभीर्य समजावल्यावर त्यांनी देखील सहकार्य केले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला.