निवडणुकांतील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम तसेच अवैध दारु जप्त केली आहे.
निवडणूक आयोगाकडून नेमणूक करण्यात आलेल्या भरारी पथकाने महाराष्ट्रातून आतापर्यंत सुमारे ११ कोटी ३६ लाख ४८ हजार ८८५ कोटी रुपयांची रोख रक्कम तर ७० लाख रुपयांहून अधिक किंमतीची सुमारे दोन लाख लिटर अवैध दारु जप्त केली आहे तर दुसरीकडे हरयाणा राज्यातून या पथकाने आतापर्यंत ४८ लाख ६० हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तर ९७२ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहे.
निवडणुकीदरम्यान काळा पैशाच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे. आयकर, सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागांसारख्या केंद्रीय महसूल विभागातील अधिका-यांची या पथकात नेमणूक करण्यात आली आहे.
येत्या १५ ऑक्टोबरला दोन्ही राज्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. तर १९ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे.