जागतिक बॉक्सिंग स्पर्धेला मंगळवारपासून (६ ऑक्टोबर) दोहय़ात सुरुवात होत असून पदकासह ऑलिंपिक कोटा मिळवण्याचे लक्ष्य भारताच्या बॉक्सर्सनी ठेवले आहे.
जागतिक स्पर्धेत एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), मदन लाल (५२ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनोज कुमार (६४ किलो), विकास कृष्णन (५७ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोवरील) भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मात्र भारतीय बॉक्सिंग असोसिएशनची मान्यता काढून घेण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) झेंडय़ाखाली सर्वजण खेळतील. भारतातर्फे विकास, शिवा, देवेंद्रो आणि मनोजकडून पदकाची अपेक्षा आहे. या स्पर्धेत २०११मध्ये विकासने कांस्यपदक मिळवलेय.
आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवत त्याने अपेक्षा उंचावल्यात. शिवा आणि मनोजलाही त्याच्या गटातून ऑलिंपिकवारी नक्की करण्याची संधी आहे. मात्र देवेंद्रोला रिओचे तिकीट मिळवायचे असेल तर सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवावे लागेल. सतीशला ऑलिंपिक कोटा मिळवायचा असेल तर ‘सुवर्ण’ कामगिरीशिवाय पर्याय नाही.
‘‘भारताचे सर्वच बॉक्सर शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम आहेत. जागतिक स्पर्धा असल्याने स्पर्धा चुरशीची असली तरी सवरेत्कृष्ट कामगिरीचे ध्येय सर्वानी ठेवले आहे,’’ असे भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनी सोमवारी सांगितले.
जागतिक स्पर्धेत १० वजनी गटांमध्ये ७३ देशांचे २६० बॉक्सर नशीब अजमावतील. त्यात युरोपमधील सर्वाधिक ९४, आशियातील ६६, अमेरिकेतील ५१, आफ्रिकेतील ३२ आणि ओशेनियातील १७ बॉक्सर्सचा समावेश आहे.
या स्पर्धेद्वारे २३ बॉक्सरना ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. ऑलिंपिकसाठी कमी ‘कोटा’ असल्याने पदकविजेत्यांनाच ऑलिंपिकवारी शक्य आहे. ९१ आणि ९१ किलोवरील गटातील केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच रिओ ऑलिंपिकचे तिकीट मिळेल.