नेरळजवळील भडवळ-दामत गावाची नळपाणी योजना अद्याप पूर्ण झालेली नाही.
येथील अडीच कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे काम धिम्या गतीने सुरू आहे. उन्हाळयात विहिरी कोरडया पडल्याने महिलांना पाण्यासाठी ओहोळात खड्डे खोदून पाणी काढावे लागले. त्यामुळे पाणी योजनेचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत आहे. पण, कंत्राटदाराकडून पाणी योजना कमिटी व प्राधिकरणाला काम करण्यात अडथळे आणले जात असल्याने ही योजना रखडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थ फक्त धुणीभांडी व अन्य कामांसाठी या पाण्याचा वापर करत आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी अन्य गावांतून हंडे भरून पाणी आणावे लागत आहे.