यूपीए सरकारने आणलेल्या ‘आधार’ची उपयुक्तता पटल्याने विविध सेवा त्याच्या अखत्यारित आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
गॅस सिलिंडरचे अनुदान, शैक्षणिक शिष्यवृत्तीला ‘आधार’ सक्तीचे केले आहे. आता बोगस मतदारांना चाप लावण्यासाठी मतदार यादीला ‘आधार’ क्रमांक जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी केली. येत्या एक मार्चपासून देशभरात ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा म्हणाले की, मतदारयादी शुद्धीकरण आणि सत्यता पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील ६७६ जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात येणार असून हे काम यंदा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. देशाची मतदारयादी पूर्णपणे खरी बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. नागरिकांनी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर आपला आधार क्रमांक नोंदवावा, असे आवाहन ब्रह्मा यांनी केले आहे.
ऑनलाईन मतदानाबाबत ते म्हणाले की, ही पद्धत अमलात आणण्यासाठी घटनात्मक सुधारणा करणे गरजेचे आहे. तसेच या पद्धतीबाबत मतभेद आहेत. तसेच राजकीय पक्षांचाही अजूनही ईव्हीएम मशीनवर मोठय़ा प्रमाणावर विश्वास आहे. २००६ पूर्वीच्या आठ लाख ईव्हीएम मशिन्स बाद करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान सक्तीचे करण्याबाबत कोणतीही योजना नाही, असेही ते म्हणाले.