‘झी युवा’ वाहिनीवरील लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या ‘फुलपाखरू’ या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल सेटवर मोठे सेलिब्रेशन झाले. केक कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ‘फुलपाखरू’ मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. सर्व कलाकारांनी इथवरच्या प्रवासामध्ये समर्थपणे साथ देणा-या मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले.
यावेळी हृता दुर्गुळे म्हणाली, ‘४०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे, ही आम्हा सर्वासाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. प्रेक्षक यापुढेही आम्हाला अशीच साथ देतील अशी आशा करते.’ मानसची भूमिका करणारा यशोमन आपटे याने म्हटले की, ‘‘चारशे भागांचा टप्पा पार ही आमच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारी बाब आहे. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणा-या सर्व चाहत्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. हा एक सुंदर प्रवास होता. यानंतर पुढील टप्पेही यशस्वीपणे गाठू, असा विश्वास आहे.’’