मिरा-भाईंदर महापालिका स्थायी समितीने शिक्षण मंडळाच्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर केलेला असतानाही महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील १० हजार विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्याचा पुरवठाच करण्यात आलेला नाही.
भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिका स्थायी समितीने शिक्षण मंडळाच्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर केलेला असतानाही महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील १० हजार विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्याचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शिक्षण मंडळाचे उपायुक्त विलास ढगे यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी व विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक प्रशांत दळवी यांनी केली आहे.
मार्च महिन्यात पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या शिक्षण मंडळाच्या अर्थसंकल्पात, महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश, वा, बूट-मोजे आणि शालेय दप्तर इत्यादी साहित्य पुरवण्याकरता आवश्यक तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. या तरतुदीला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी हे साहित्य दिले जाणे आवश्यक असतानाही विद्यार्थ्यांना अद्याप हे साहित्य मिळालेले नाही. मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्राथमिक शाळांत १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून हे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत.
उल्हासनगर महापालिका शाळांतील विद्यार्थीही शैक्षणिक साहित्यांपासून वंचित
उल्हासनगर – शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट, बूट इत्यादी शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. याबाबत पालिका प्रशासनाकडून योग्य ती हालचालही होत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पालिकेला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या एकूण २८ शाळा असून या शाळांत ९ हजार विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून गणवेश, रेनकोट, बूट, वह्या, दप्तरे इत्यादी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले जाते. मात्र शाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी शिक्षण मंडळाने दीड महिन्यापूर्वी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पालिकेकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी न मिळाल्याने प्रस्ताव रखडला आहे.
याबाबत पाठपुरावाठा करूनही योग्य ती कारवाई पालिका प्रशासन करत नसल्यामुळे ३० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप न झाल्यास पालिका मुख्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. याबाबत पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांना विचारले असता, लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले.