नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीत लपलेले धबधबे, हिरवीगार झाडी, डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानला जाणारा घाटरस्ता खचला आहे.
नेरळ-माथेरान घाटरस्ता हा वळणावळणाचा असल्याने या रस्त्यातून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, नांगर िखडीच्या वळणावर एका बाजूला रस्ता खचला आहे. त्यामुळे माथेरानला जाणा-या पर्यटकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने जुम्मापट्टी ते दस्तुरी नाका अशा चार किमीच्या रस्त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचे कंत्राट चिंतामणी कंपनीला दिले होते.
या रस्त्याची डागडुजी करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कंपनीने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे बांधकाम विभागाविरोधात वाहनचालकामध्ये नाराजी पसरली आहे.
नेरळ-माथेरान घाटरस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघाताचे संकट टळू शकते. – संतोष शिंगाडे, सामाजिक कार्यकत्रे , माथेरान