निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसला काय उत्तर द्यायचे, याची पूर्ण तयारी मी केलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलताना केले.
बीड जिल्ह्याच्या दौ-यावर असणा-या मुंडे यांनी माजलगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. आपण मागील लोकसभा निवडणुकीत ८ कोटी रुपये खर्च केल्याचे विधान मुंडे यांनी मुंबई येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळय़ात केले होते. त्यानंतर मोठे राजकीय वादळ उठले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
याच दरम्यान, मुंडे यांना निवडणूक आयोगाचेही पत्र मिळाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यात आमदार अमरसिंह पंडित यांनी मुंडे यांच्यासंदर्भात काही विधान केल्यामुळे मुंडे आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांत चकमकी झडत होत्या. निवडणूक आयोगाला मी योग्य ते उत्तर देणार आहे. त्यामुळे कोणीही चिंतीत होऊ नये. मी राष्ट्रवादीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांबद्दल बोललो नसताना, पंडित तसे का बोलले याचा मला अर्थ कळत नाही. मात्र मी त्यांना माफ केले असल्याने कार्यकर्त्यांनी आता शांतता पाळावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.