राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनतेसाठी कुठलीही ठोस, दिलासादायक घोषणा न करता सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
सरकारने कर्जमाफीचा साधा निर्णय घेतला असता तर ६१ टक्के शेतक-यांच्या आत्महत्या वाचल्या असत्या. या शेतक-यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असल्याने तुमच्यावरही आता ३०२चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा दणकाही त्यांनी दिला. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दुष्काळी चर्चेला मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना मुंडे यांनी सरकारच्या घोषणा खोटय़ा आणि जुन्याच असे पुराव्यासह सभागृहात सिद्ध केले.
मोठय़ा प्रमाणावर मजुरांचे होणारे स्थलांतर, शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन नाही, खरीप-रब्बी हंगामातील नुकसानीसाठी केवळ ३५०० कोटी रुपयांची घोषणा प्रत्यक्षात केवळ १९०० कोटी रुपयांचेच वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे सांगत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.