भारतात हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी नसल्याचे पाकिस्ताकडून सांगितले जाते. मग हे दहशतवादी आकाशातून पडतात काय, असा संतप्त सवाल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केला आहे.
भारताला पाकिस्तानबरोबर शांततापूर्ण संबंध स्थापन करायचे आहेत, मात्र देशाच्या भौगोलिक सीमांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शेजारील देशाकडून सीमेवर चाललेल्या दहशतवादी कारवाया कदापी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे इशारा राष्ट्रपतींनी दिला.
दहशतवादी कारावाया या संपवल्याच पाहिजेत. भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही वारंवार पाकिस्तानला त्यांच्या भूभागावरील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून टाकण्यास सांगत आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले.
भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करू देणार नाही असे आश्वासन २००४ मध्ये पाकिस्तानने दिले होते. आता भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा सहभाग नाही असे सांगितले जाते. मग ते दहशतवादी आकाशातून येत नाहीत. पाकिस्तान या दहशतवादी हल्ल्यांना समर्थन देत नसेलही, मात्र दहशतवादी सीमेपलिकडूनच घुसखोरी करतात हेच आतापर्यंत दिसून आले आहे, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
भारत आपल्या शेजा-यांशी चांगले संबंध ठेऊ इच्छितो. मात्र त्यासाठी सध्या चालू असलेल्या कुरघोडी पाकिस्तानने त्वरीत थांबवण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. भारताची सीमेबाबत काही महत्त्वाकांक्षा नाही, तर शेजारील राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे सांगताना राष्ट्रपतींनी शिमला कराराचे उदाहरण दिले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ साली पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो भारताशी एक करार केला. ‘शिमला करार’ म्हणून तो प्रसिध्द आहे. या करारानुसार त्यावेळी ९१ हजार युद्ध कैद्यांना मुक्त करण्यात आले होते, याची आठवण मुखर्जी यांनी यावेळी सांगितली.
तुम्ही तुमचे मित्र निवडू शकता मात्र शेजारी नाही, त्यामुळे तुम्हीच ठरवायचे असते की तुम्ही त्यांच्याशी कसे संबंध प्रस्थापित करायचे, तणावाचे की शांततेचे. आम्ही शांततेची निवड केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत. याचा अर्थ असा होत नाही की सीमेबाबत कोणतीही तडजोड केली जाईल, ते कदापी शक्य नाही असे मुखर्जी यांनी सांगितले. मुखर्जी यांनी या वेळी देशात होऊ घातलेल्या निवडणुका, आर्थिक स्थिती यावरही भाष्य केले.
BRAVO!!!