मागील या पाच महिन्यात देशात जातीय हिंसाचाराच्या प्रमाणात २४ टक्क्यांची वाढ झाल्याचे सरकारने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ३१ मे २०१५पर्यंत देशभरात २८७ जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. तर २०१४ मध्ये मेपर्यंत ही संख्या २३२ इतकी होती.
तर जातीय हिंसाचारामुळे जानेवारी ते मे या पाच महिन्यात ४३ जणांचे बळी गेले. तर जखमींचे प्रमाण ७०१ वरुन ९६१ पर्यंत वाढले.
उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जातीय हिंसाचाराच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षींचे हे पाच महिन्यांतील प्रमाण अधिक आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१३ जातीय हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण अनुक्रमे ८२३ वरुन ६४४ पर्यंत कमी झाले होते. तर हिंसाचारातील बळींची संख्याही २०१३ मध्ये १३३ तर २०१४ मध्ये ९५ इतकी होती.