मराठीतील प्रसिद्ध नाटककार, कथा – कादंबरीकर जयवंत दळवी यांचा आज जन्मदिन. ज्यांच्या नाटकामुळे मराठी रंगभूमीला नवे चैतन्य लाभले असा, ललितमधून मराठी सारस्वतांना नाजूक चिमटे घेणारा हा ठणठणपाळ! संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, कालचक्र, नातीगोती, पुरुष ही त्यांची आजही रसिकप्रिय असणारी नाटके, तर अंधाराच्या पारंब्या, अथांग, अधांतरी, चक्र, वेडगळ, सावल्या, ऋणानुबंध, या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. दळवींनी बहुधा आपल्याच कादंब-यांची नाटके केली. दळवींची बॅरिस्टर, संध्याछाया, सावित्री, नातीगोती, कालचक्र ही नाटके माणसा – माणसांतील गहिरे भावजीवन उलगडून दाखवतात. तर, सूर्यास्त, पर्याय, लग्न अशा नाटकातून त्यांची समाजभिमुखता जाणवते. जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्टय़! दोन भिन्न स्तरावरच्या जोडप्यांच्या सुखदुख:चा शोध त्यांनी महासागरमध्ये घेतला, तर स्त्री -पुरुषांतील तफावतीचे व अहंकाराचे आणि मदांध राजसत्तेचे दर्शन त्यांनी पुरुषमधून घडवले. नाटय़दर्पणाचे सोळा पुरस्कार मिळवणारा मराठी रंगभूमीवरचा हा आघाडीचा नाटककार! दि. १६ सप्टेंबर १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा जन्मदिन.