काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून तेथील जनतेने त्यांच्या राज्यात लोकशाही पद्धतीने सरकार निवडून दिले आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याच्या मागणीला अर्थ नसल्याचे गुरुवारी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
बुधवारी याच परिषदेत बोलताना पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष मुर्तझा जावेद अब्बासी यांनी ‘काश्मीरमधील नागरिकांना त्यांच्या भवितव्याचा निर्णय स्वत: घेण्याची मुभा दिली पाहिजे, त्यासाठी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची आवश्यकता आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी बोलताना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
‘काश्मीरमधील जनतेने स्वच्छेने आणि लोकशाही पद्धतीने मतदान करून त्यांचे सरकार निवडले आहे, काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. शिवाय जगातील प्रत्येक व्यासपीठावर पाकिस्तान फक्त काश्मीरचाच मुद्दा उपस्थित करतो, हे अत्यंत चुकीचे आणि असंबद्ध आहे’, अशा शब्दांत त्यांनी यावेळी पाकिस्तानवर टीका केली.
शिवाय ‘पाकिस्तानने त्यांच्या देशाचा विकास कसा होईल, त्यांच्या देशातील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा कशा मिळतील, याचा विचार जास्त करावा’, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिल्या. ‘पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक व्यासपीठावर फक्त काश्मीरचाच मुद्दा उपस्थित करत आहे. हे व्यासपीठ जागतिक विकासासाठी आहे. काश्मीरचा मुद्दा हा जागतिक मुद्दा नाही’, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.